पालखी सोडून भोई गेले !
——————————-
घेऊन आलो खांद्यावरुनी शतकांची पालखी
राजा होता,प्रधान होता तीच होती मालकी ||
सळसळ होती पानांमधुनी,कुजबूज होती रानी
घामामधून श्वास विरघळे,अंगभर विटाळ पाणी ||
गोठविताही गोठू येईना चाले संतत धारा
हुकूमाचा तो ताबेदारही, लोटून देई वारा ||
नीतीभ्रष्टांच्या पुरासवे मी, वाहत आलो कैकदा
वाटेवरती स्थिरवलो अन वळलो पुन्हा एकदा ||
भूमीसाठी हृदय वाहण्या झुकलो जरासा परी
पालखीतले हात निघाले,पुरते घुसले उरी ||
फुलाफुलांच्या मनात तेव्हा सले शल्य मोकळे
ह्या भोयाला स्पर्शून जावे रंगावे आगळे ||
या शतकाची वेळ आजची झुले स्फुरे अंबर
खांद्यावरले व्रणही उठले,कसुनिया कंबर ||
धमण्या चिडल्या,कोसळले नभ,वृक्ष बने खंबीर
पाय झटकुनी क्षणात उठले,तटस्थ औदुंबर ||
—— प्रसाद सावंत
शेअर करा..