औट घटकेचा राजा

औट घटकेचा राजा …
————————————————————-
मनाला चैतण्य देणारा , निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला अल्हाददाई श्रावण महिना . अबाल वृद्धांना , महिलांना , तरुणाईला , भाऊ बहिणीला अत्यंत प्रिय असलेला श्रावण ! सणांचा राजा श्रावण ! महिना भर सणांची नुसती रेलचेल असते . आसमंतात चैतन्य भरुन राहिलेले असते . सुरुवात होते नागपंचमी च्या सणांने . या दिवशी सासरी नांदत असलेल्या लेकी बाळी माहेरी येतात . फेर धरुन गाणे गातात , वारुळाची पुजा करतात . झाडावर झोके बांधून मनसोक्त खेळतात .
नागपंचमी चा दुसरा दिवस म्हणजे श्रावण षष्टीचा दिवस . या षष्टीला श्रीयाळ षष्टी असे म्हणतात , कोणी शिराळ षष्टी तर कोणी सक्रोबा म्हणतात .
तेराव्या शतकात एक राजा होऊन गेला . त्याचे नाव श्रीयाळ शेठ ! चांगूणा ही त्या राजाची राणी . त्यांना एक मुलगा होता . त्याचे नाव चिलिया ! श्रीयाळशेठ राजा व चांगूणा राणी दोघेही अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते . भरपूर दानधर्म करीत असत . त्याच्या राज्यात कोणालाही तो काही कमी पडू देत नव्हता . दारी आलेला याचक कधीही विन्मुख जाऊ देत नव्हता . आपल्या राज्यात कोणीही उपाशी राहू नये असा त्याचा कटाक्ष होता . चांगूणा राणी ही श्रीयाळ शेठ राजाला साथ देत होती .
श्रीयाळशेठ राजा भगवान शंकराचा निस्सिम भक्त होता . राजा राणी दोघेही नित्य शंकराची आराधना करत असत . एकदा भगवान शंकराने त्यांची परीक्षा पाहाण्याचे ठरवले व ते साधूचा वेश घेऊन त्यांच्या राजवाड्यात गेले . राजाने साधूमहाराजांचे आदरातिथ्य केले व भोजनाचा आग्रह केला . साधू महाराजांनी भोजनासाठी नरमांसाची मागणी केली . श्रीयाळ शेठ राजा व चांगुणा राणी दोघेही शाकाहारी होते त्यांना मांसाहार वर्ज्य होता पण आपण नकार दिला तर साधूमहाराज उपाशी जातील व आपले सर्व हरण होईल म्हणून ते दोघेही राजाराणी साधूमहाराजाला नरमांसाचे भोजन द्यायला तयार झाले . इतक्यात राजी होतील ते साधुमहाराज कसले ? चांगुणा राणीला म्हणाले मला तुझ्या बाळाचे मांस पाहिजे व ते तू स्वत: तयार केले पाहिजे तरच मी जेवण करीन नाही तर हा मी चाललो उपाशी ! असे साधुमहाराजांचे बोलणे ऐकल्यावर चांगुणा राणी च्या पायाखालची जमीन सरकली . तीच्यावर दु:खाचे आभाळच कोसळले . पण काळजावर दगड ठेवून चांगुणा राणी हे दिव्य करायलाही तयार झाली . तिने आपल्या चिलिया बाळाचे शिर धडावेगळे केले व त्याची आठवण राहावी म्हणून फक्त धडच उखळात मधे घालून कुठले व त्यांचे माणसं शिजवून ते त्या साधुमहाराजांना वाढले . पण त्या भाषांमधे बाळाचे शिर नाही हे साधुंच्या लक्षात आले व त्यांनी पुन्हा जेवनास नकार दिला .
चांगुणा राणीने पुन्हा ते चिलिया बाळाचे शिर उखळात घालून कुठले व ते शिजवून साधुमहारांचाच्या पुढे ठेवले .
भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी आपले मूळ स्वरूप हे प्रगट केले व श्रीयाळ राजा व चांगुणा राणी ला म्हणाले मी तुमची परीक्षा पाहिली . मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे . तुम्हाला काय मागायचे ते मागा . भगवान शंकराचे हे बोलणे ऐकून चांगुणा राणीने हंबरडा फोडला व बाळ चिलियाला हाक मारु लागली . आणि काय आश्चर्य , बाळ चिलिया दुडूदुडू धावत आला आणि आपल्या आईला बिलगला .
सन १३९६ ते १४०७ या काळात या काळात सलग १२ वर्ष भयंकर दुष्काळ पडला . या दुष्काळात मधे श्रीयाळशेठ राजाने आपल्या प्रजेसाठी खूप मदत केली . भरपूर अन्नधान्य वाटले ! कोणाला काही कमी पडू दिले नाही . यावर बहामनी राजाने खुष होऊन त्याला काय मागायचे ते माग म्हणाला तेंव्हा श्रीयाळ शेठ राजाने औट घटकेचे राज्य मागून घेतले . औट घटका म्हणजे साडेतीन घटका ! बहामनी राजाने श्रीयाळशेठ राजाला औट घटकेचे राज्य बहाल केले . तेंव्हा पासून त्या राजाला औट घटकेचा राजा असे संबोधले जाऊ लागले . आज मात्र काळाच्या ओघात श्रीयाळशेठ राजांचे औदार्य , त्याचा त्याग प्रजेच्या बद्दल त्याची असलेली कणव हे सर्व मागे पडले आहे .

अरविंद रामचंद्र कुलकर्णी .
(पिंपरखेड कर)
9422613664
[email protected]

अरविंद रामचंद्र कुलकर्णी

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
Rajiv Pujari

श्रीयाळ शेठ राजा होता तर बहामनी राजाकडे त्याने औट घटकेचे राज्य का मागून घेतले?

Dr joshi

खरे तर श्रीयाळ चांगुना आणि चिलया बाळ यांची कथा खूप पुरातन आहे .12 व्याा शतकामध्ये श्री संत नामदेव महाराज यांनी जी अभंगारचना केली आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी या श्रीयाळ चांगुना यांच्या जीवनचरित्र वरती अभंग रचलेले आहेत. म्हणजे हे चरित्र चौदाव्या शतकामध्ये नाही तर बाराव्या शतकाच्याही आधी घडलेली आहे. त्यामुळे बहामनी बादशहा आणि या चरित्राचा काडीमात्र संबंध नाही. आऊट घटकाचे राज्य हे प्रत्यक्ष महादेवांनी प्रगट होऊन त्यांना बहाल केले होते.